TOD Marathi

मुंबई:

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते, असा गर्भित इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (Devendra Fadnavis in Mumbai)

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तुम्ही कोणामुळे जिंकले आहात हे आम्हाला माहिती आहे, असा दावा मविआतील काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यांनी खरंच ही गोष्ट माहिती असेल तर ते आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत कारण महाविकास आघाडीला त्यांचे सरकार टिकवायचे आहे. मविआ आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करायला गेली तर ते आमदार पक्षाची साथ सोडतीलच मात्र त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असूनही मनाने आपल्यासोबत असलेल्या व दबावामुळे आपल्याला मदत न करू शकणारे आमदारही सरकारमधून निघून जातील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

विधानपरिषद निवडणुकीच्या (mlc election) ६ जागा आम्ही लढवतो आहोत. निवडणूक कोणतीही असो ती सोपी नसते. पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि ‘सिक्रेट बॅलेट वोट’ सिस्टीम पाहता आम्हाला चांगलं मतदान होईल. आपल्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

केवळ सरकार चालविण्याकरिता म्हणून बदल्याची भूमिका ठेवणे हे योग्य नाही. २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने सेना-भाजपला क्लिअर मॅन्डेट दिलं होतं. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही बनविलेलं सरकार चालवून दाखवा, एकतरी चांगलं काम करुन दाखवा.राज्य सरकारला अडीच वर्षांचा कालावधी लोटला पण दाखविण्यासाठी एक काम नाही. मोदी सरकारचीच कामे या सरकारला दाखवावी लागतात. जीएसटीचा पूर्ण पैसा दिल्यानंतरही यांची सारखी तीच ओरड असते. सर्वात श्रीमंत राज्य असूनही पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी करायला तयार नाही. पण या सरकारला इंधनाचे भाव कमी करावे लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.